लिंबू हे भारतीयांच्या अन्नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. लिंबाचे ईडलिंबू आणि कागदी लिंबू असे दोन मुख्य प्रकार आहेत. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात. लिंबू हे फळ आहे. महाराष्ट्र राज्यात ज्या अनेक फळझाडांची लागवड केली जाते त्यामध्ये लिंबूवर्गीय फळझाडांच्या फार मोठा वाटा आहे. लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीस भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मोसंबी, संत्रा व कागदी लिंबू यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळझाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे कागदी लिंबू लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत असून सध्या ४०,००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र कागदी लिंबूच्या लागवडीखाली आहे. प्रामुख्याने अहमदनगर, जळगाव, सोलापूर व अकोला जिल्ह्यात कागदी लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. त्या खालोखाल पुणे, यवतमाळ, नाशिक, सांगली, नागपूर, धुळे व बीड यांचा क्रम लागतो. कोकणात कागदी लिंबूची लागवड आढळून येत नाही. कारण दमट हवामानात कँकर तसेच मूळकुज रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. सर्वसाधारणपणे शेतकर्यांना लिंबू उत्पादनामध्ये खैर्या ( सिट्रस कँकर ) रोगाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यासाठी लेमन आणि लाइम यांचा संकर करण्याबाबत संशोधन व्हावे. कारण लेमन (ईडलिंबू) हे फळ उत्तर भारतातील असून त्याची साल जाड असते. आम्लता ३ ते ५ % व फळ मोठ्या आकाराचे असून हे खैर्या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. लाईम (लिंबू) हे फळ दक्षिण भारतातील असून त्याची साल पातळ असते, आम्लता ७ ते ८% व आकार मध्यम स्वरूपाचा असून खैर्या रोगास बळी पडते. तेव्हा या दोघांच्या संकरातून कँकर रोगमुक्त जाती निर्माण झाल्या पाहिजेत, अशी शेतकर्यांची मागणी आहे. तसेच हस्त बहाराच्या लिंबांना उन्हाळ्यात भरपूर मागणी असते, तेव्हा या बहाराचे अधिक उत्पादन मिळेल या दृष्टीने लिंबू उत्पादक संघाकडून, विद्यापीठातून संशोधन व्हायला पाहिजे अशी मागणी आहे.
लिंबू लागवड: कमी खर्च, जास्त नफा! | Lemon cultivation: low cost, high profit!
जमीन
लिंबू लागवड कोरड्या हवामानातील भागातच लिंबांची लागवड करावी. कोरडे हवामान व कमी पर्जन्यमानात कागदी लिंबाच्या झाडाची वाढ झपाट्याने होते. हे लक्षात घेऊन कागदी लिंबू लागवडीचे नियोजन करावे. कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी. साधारणपणे ६.५ ते ७.५ सामू व क्षारांचे प्रमाण ०.१ टक्क्यापेक्षा कमी असलेली जमीन कागदी लिंबू लागवडीस चांगली असते. हे बागायती बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे हमखास पाणीपुरवठ्याची सोय असेल तेथेच लागवड करावी.
सुधारित जाती
साई शरबती, फुले शरबती तसेच राज्यात काही भागांत विक्रम, प्रमालिनी, चक्रधर, बालाजी, पीकेएम-१ या जातींचीही लागवड आढळते.
लिंबू लागवड: कमी खर्च, जास्त नफा!
1) साई – शरबतीची वैशिष्ट्ये :-
उत्पादन – ४६.९० टन/हेक्टर/वर्षे
फळाचे वजन – ४९.८७ ग्रॅम
रसाचे प्रमाण – ५४.५१ टक्के
सालीची जाडी – १.५२ मि.मी.
उन्हाळी उत्पादन – २४.४७ टक्के
फळे अंडाकृती, एकसारखी आकाराची आणि फळे पातळ सालीची, कॅंकर आणि ट्रिस्टेझासाठी सहनशील.
2) फुले शरबतीची वैशिष्ट्ये :-
लवकर बहर – तिसऱ्या वर्षापासून
जास्त उत्पादनक्षमता – ५२.१९ टन/हेक्टर/वर्षे (१३व्या वर्षी)
जास्त उन्हाळी पीक – २५.४२ टक्के
गोलाकार फळे व पातळ साल – १.९५ मि.मी.
जास्त रसाचे प्रमाण – ५२.५२ टक्के
जोमदार झाडांची वाढ – आकारमान ८६.५० घनमीटर
रोग व किडीस जादा सहनशील
लागवडीसाठी लिंबू रोपे | Lemon plants for planting
- लिंबांची अभिवृद्धी बियांपासून व कलमांद्वारे होत असली तरी लिंबांची लागवड बियांपासून तयार केलेल्या रोपांपासूनच करावी.
- बियांपासून तयार केलेल्या रोपात मातृवृक्षाचे १०० टक्के गुणधर्म उतरलेले असतात. अशी रोपे प्रथमतः विषाणूमुक्त असतात.
- रोपांपासून मिळणारी फळे पातळ सालीची व रसाचे प्रमाण जास्त असणारी असतात.
- बियांपासून रोपे तयार केल्यास बीजांकूर शास्त्रोक्त पद्धतीने होत असते व ही झाडे दीर्घायुषी व जास्त उत्पादनक्षम असतात.
लागवडीचे अंतर | Planting distance
- लागवड ६ X ६ मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी १ X १ X १ मीटर आकाराचे खड्डे उन्हाळ्यात खोदून उन्हात चांगले तापू द्यावेत.
- पावसाळ्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यात दीड ते दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत ट्रायकोडर्माची मात्रा, पाच ते सहा घमेली चांगले कुजलेले शेणखत, सेंद्रिय खत, निंबोळी पेंड व चांगल्या पोयटा मातीने खड्डे भरावेत.
- त्यानंतर जातिवंत रोपांची लागवड करून योग्य व्यवस्थापन करावे.
खत आणि पाणी व्यवस्थापन | Fertilizer and water management
- हवामानाचा विचार करता लिंबाच्या झाडास वर्षातून तीन वेळा म्हणजेच जून-जुलै, सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारीत नवीन पालवी येते.
- प्रत्येक वेळी नवीन वाढीपूर्वी सुरवातीच्या काळात नियमित खतांचा पुरवठा करणे जरुरीचे आहे.
- खतमात्रा माती परीक्षणानुसारच द्यावी.
- पाच वर्षांवरील पूर्ण वाढलेल्या लिंबाच्या झाडास जोमदार वाढ, दर्जेदार फळांचे अधिक उत्पादन व मध्यम, खोल जमिनीची सुपीकता यासाठी १५ किलो शेणखत + १५ किलो निंबोळी पेंड + ६०० ग्रॅम नत्र , ३०० ग्रॅम स्फुरद , ६०० ग्रॅम पालाश द्यावे.
- त्याचबरोबरीने ५०० ग्रॅम व्हॅम + १०० ग्रॅम पी.एस.बी. (स्फुरद विरघळणारे जिवाणू) + १०० ग्रॅम ऍझोस्पिरीलियम + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा ही जैविक खते प्रति वर्षी प्रति झाडास देण्याची शिफारस आहे. ही खत मात्रा देताना ४० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद, पालाश, शेणखत, निंबोळी पेंड व जैविक खते जूनमध्ये द्यावीत.
- त्यानंतर उरलेले ६० टक्के नत्र दोन समान हप्त्यात सप्टेंबर आणि जानेवारीत विभागून द्यावे.
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कमी करण्यासाठी मार्च व जुलै महिन्यात नवीन पालवी आल्यावर ०.५ टक्का तीव्रतेचे झिंक सल्फेट, मॅंगनिज सल्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट आणि ०.३ टक्का फेरस व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्यांची एकत्रित फवारणी करावी.
- लिंबाच्या झाडाला पाणी देताना ते झाडाच्या खोडाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
- याकरिता दुहेरी आळे (डबल रिंग) पद्धतीने पाणी द्यावे. पाण्याचे प्रमाण व दोन पाळ्यांमधील अंतर हे जमिनीचा प्रकार, हवामान, झाडाचे वय व वाढीची व्यवस्था यावर अवलंबून असते. बागेत तणनियंत्रण करावे.
- रासायनिक खताला पर्याय म्हणून गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
- चुनखडी, खारवट जमिनीत ताग किंवा धैंच्याचे पीक घेऊन ते फुलोर्यात येतानाचा गाडावे.
- गाडल्यानंतर २ ते ३ वेळा ४ -४ दिवसाला पाणी द्यावे, म्हणजे महिन्याभरात ते लवकर कुजून जाते.
आंतरपीक
- लिंबाच्या झाडांची लागवड सुरवातीच्या चार-पाच वर्षांपर्यंत फळे येण्यापूर्वी लिंबांच्या दोन झाडांमधील मोकळ्या जागेत सुरवातीला कांदा, लसूण, मूग, चवळी, हरभरा, घेवडा, भुईमूग, गहू, मोहरी यांसारखी आंतरपिके घ्यावीत.
- आंतरपिके घेताना मुख्य पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होणार नाही आणि बागेची सुपीकता कायम राहील याची काळजी घ्यावी.
- मुख्य पिकाव्यतिरिक्त आंतरपिकास शिफारशीप्रमाणे खताची वेगळी मात्रा द्यावी.
बहार व्यवस्थापन

- लिंबू लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनी फळे लागतात.
- साधारणपणे मृग (जून), हस्त (ऑक्टोबर ) व आंबे (फेब्रुवारी) बहार धरतात.
- परंतु हस्त बहार धरल्यास मार्च ते जूनमध्ये फळे (लिंबू) मार्केटमध्ये येऊन बाजारभाव अधिक सापडतात.
- त्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची उत्तम सोय असावी लागते. हस्त बहार घेतेवेळेस सप्टेंबरमध्ये अती पावसामुळे फळे लागत नाहीत, लागलेली फळे सापडतात.
- एप्रिल – मे मध्ये फळे लागतात, परंतु गुंडीगळ होते. ती थांबविण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून अगोदरच संजिवकांची फवारणी करावी.
- हस्त बहारातील अधिक उत्पादनासाठी जून महिन्यात जिब्रेलिक असीड (जी.अे.३) १० पी.पी.एम.सप्टेंबरमध्ये सायकोसील किंवा लिहोसिन (सी.सी.सी.) १००० पी.पी.एम. संजिवकाची व ऑक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी.
तण व्यवस्थापन
- ग्लायफोसेट (ग्लायसेल) १००-१२० मि.लि + १००-१२० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर फवारणी करावी, त्यानंतरच्या दोन फवारणी तणांची पुर्नउगवण ३० % आढळून आल्यानंतर कराव्यात.
कीड व रोग नियंत्रण | Pest and disease control
किडी नियंत्रण
- पाने पोखरणारी अळी :- कोवळ्या पानात शिरून आतील मगज खाते, पानांवर वेडेवाकडे पट्टे दिसतात. पाने चुरगळल्यासारखी होऊन झाडाची वाढ खुंटते. पाने पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी नोहॅलूरॉन ५ मि.ली किंवा इमिडाक्लोप्रीड २.५ मि.लि. किंवा थायडीकार्ब १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी क्किनॉलफॉस २० मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पांढरी / काळी माशी :- पानातील रस शोषून घेतल्याने पाने निस्तेज होऊन वाळतात, काळी बुरशी पडते. त्यास “कोळशी’ रोग असेही म्हणतात. पांढरी / काळी माशीच्या नियंत्रणासाठी अॅसिफेट १५ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- कोळी कीड :- पाने व फळांवर फिक्कट, पिवळे खड्डे दिसून, फळे विद्रुप दिसतात. कोळी कीड नियंत्रणासाठी अबामेक्टीन ४ मि.लि किंवा पोपरगाईट १०.मि.लि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- याशिवाय मावा, पिठ्या ढेकूण इ. किडींचाही प्रादुर्भाव लिंबावर होतो. सिल्ला, मावाच्या नियंत्रणासाठी अबामेक्टीन ४ मि.ली किंवा पोरपगाईट १० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर पिठ्या ढेकूणच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस २५ मि.लि किंवा डायमिथोएट १५ मि.लि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच व्हर्टिसिलिअम लेकॅनी 20-40 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील सर्व किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी वेळोवेळी ‘कृषी विज्ञान’ केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी.
👉 रेशीम उद्योग रेशीम उद्योग अनुदान
👉पोकरा योजना महाराष्ट्र (2024)
👉अण्णासाहेब पाटील कर्ज योजना Annasaheb Patil Loan Yojana
रोग नियंत्रण
- कँकर / खैर्या : हा रोग झान्थोमोनास या अणूजीवतंतूमुळे होतो. हा रोग फार संसर्गजन्य असून पावसाळी हवामान व अधिक आर्द्रता असल्यास झपाट्याने पसरतो. सुरुवातीला पानांना टाचणीच्या टोकाएवढे लहान, गोल, गर्द हिरवे व पाणीयुक्त ठिपके पृष्ठभागावर दिसतात. हे ठिपके तांबूस रंगाचे खरबरीत होऊन पानांच्या दोन्ही बाजूस दिसतात. ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाचे वलय तयार होऊन कालांतराने ते नाहीसे होते. पुढे हे ठिपके फांद्यावर वाढतात आणि झाड देवीचे व्रण ग्रासल्यासारखे दिसते. परिणामी शेंड्याकडील फांद्या मरतात. तसेच झाडे खुरटल्यासारखी दिसतात. फळांवर टिपक्यांची वाढ झाल्यास फळे तडकतात व अशा फळांना बाजारात मागणी नसते. रोपवाटिकेतील रोपांना या रोगाचा संसर्ग झाल्यास रोपांमध्ये पाने पोखरणार्या अळीने पोखरलेल्या मार्गाद्वारे हा रोग वेगाने पसरतो.
- नियंत्रण : कँकर / खैर्या रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी, छाटलेल्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे, पावसाळ्यातील महिन्यात स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून ३-४ फवारणी कराव्यात. किंवा जून महिन्यातील छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड ( ३० ग्रॅम १० लि.पाणी) ची एक फवारणी नंतर ३० दिवसाच्या अंतराने बोर्डो मिश्रण ( १ कि.मोरचूद + १ कि. चुना + १०० लि.पाणी) च्या दोन फवारण्या व नंतर निंबोळी अर्क च्या दोन फवारण्या ( ५०० ग्रॅम १० लि.पाणी) कराव्यात.
- टिस्टेझा : या रोगाची लागवड झाल्यावर झाडाची नवीन फूट पुर्णपणे किंवा अपुर्ण अवस्थेत दाबून राहते. झाडावरील पाने निस्तेज आणि शिरा पिवळसर किंवा पांढरट होतात. पाने लांब दिशेने परंतु आतील बाजूने कुरळे होतात. नवीन पालवीचे पोषण नीट न झाल्यामुळे पानगळ होते. हा रोग ओळखण्यासाठी पाने सुर्यप्रकाशात बधितल्याने त्यामधील शिरा पोकळ झाल्यासारख्या दिसतात. झाडाच्या खोडाच्या किंवा मोठ्या फांदीच्या सालीखालील भागावर सुईने टोकरल्यासारखी खोल व्रण (स्टेम पिटर्स) दिसतात.
- नियंत्रण : ट्रिस्टेझा या रोगाच्या नियंत्रणासाठी मावा या रोगवाहक किडींचे आंबे बहार, मृग बहार व हस्त बहारातील नवीन पालवीचे आंतरप्रवाही किटकनाशक वापरून रोगाचा प्रसार नियंत्रित ठेवावे.
- मुळकुज व डिंक्या : हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. सुरुवातीस मुळकुजीची लागण होऊन तंतुमय मुळे कुजतात. कालांतराने ही कूज मोठ्या मुळांपर्यंत जाऊन खोडावर पायकूज होते. खोडाच्या सालीवर ओलसर ठिपके दिसतात व त्या ठिकाणी उभ्या चिर पडून त्यामधून पातळ डिंक बाहेर पडतो. असा भाग तांबट तपकिरी दिसतो व या भागावरील पेशी मरून ठसूळ होतात. अशा झाडातील पाने निस्तेज होऊन शेंड्याकडील पाने पिवळी पडतात व पानगळ होते. झाडामध्ये अन्नद्रव्याचे अभिसरण मंदावल्यामुळे अकाली बहर येऊन फळे अपक्क स्थितीत गळून पडतात.
- नियंत्रण : पायकूज व डिंक्याच्या नियंत्रणासाठी पावसाळ्यापुर्वी फोसेटाईल अल (३० ग्रॅम १० लि.पाणी) ची फवारणी करावी आणि झाडाच्या खोडास ६०-९० सें.मी. उंचीपर्यत पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट लावावे. किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडाशेजारील मातीत एक महिन्याच्या अंतराने दोनदा ड्रेंचिग करावी.
- शेंडेमर : जुन्या व दुर्लक्षीत बागेत बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या फांद्या वरून खाली वाळत येतात. या रोगाचा प्रसार दुय्यम माध्यमातून होतो. जसे तंतुमय मुळाजवळ अतितीव्र क्षारांचे अधिक प्रमाण. अन्नद्रव्यांची कमतरता, इतर किडी व बुरशीमुळे फांद्यांना व मुळांना झालेली इजा, जमिनीत जास्त काळ पाणी साचणे इ. कारणाने कोलेटोटायकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे नवीन व पक्क फांद्या वरूनखाली वाळण्यास सुरुवात होते. नंतर ही मर बुंध्यापर्यंत जाते आणि त्यामुळे डायबॅकची लक्षणे दिसतात.
- नियंत्रण : बागेत वारंवार हलकी चाळणी करावी, त्यामुळे अन्नद्रव्याचे चांगले शोषण होऊन झाड जोमदार वाढते. पावसाळयापुर्वी आणि नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्याठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी. कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम १०.लि पाण्यात मिसळून २ -३ वेळा फवारावे.
लिंबातील प्रमुख समस्या
- पाने पिवळी पडणे लाईम इंड्यूस्ड आयर्न क्लोरॅसिस (LIIC) :लिंबाच्या झाडाच्या दक्षिणेकडील भाग हा कायम रोगट दिसतो. पाने पिवळी पडतात. LIIC चा प्रादुर्भाव होतो. पानांवर गुंडाळी येते. फुले व फळे कमी लागतात.
- पानगळ : ह्यामध्ये पाने बशी व कपासारखी, विळ्याच्या आकारासारखी कातरलेली दिसतात. पानांवर डाग,फोड दिसतात. ताम्र (Cu) चे प्रमाण कमी झाले तर पानगळ झपाट्याने होते. (ज्यावेळेस सेंद्रिय पदार्थ, प्रेसमडचे प्रमाण अधिक होते. त्यावेळेस C:N Ratio वाढतो व झपाट्याने पानगळ होते. )
वरील सर्व प्रकारच्या किडी, रोग व विकृतीपासून सरंक्षण व दर्जेदार फळे मिळविण्यासाठी सुरूवातीपासून एकात्मिक पद्धतीचा वापर करावा. कँकर (फळावरील डाग), डागबॅक (शेंडे सुकणे), गमॉसिस ( Gummosis) च्या नियंत्रणासाठी १० ते १२ लि. पाण्यामध्ये मोरचूद ५०० ग्रॅम + चुना २५० ग्रॅम + गेरू (काव) २५० ग्रॅमची पेस्ट करून खोडास ३ ते ४ फुटापर्यंत १५ दिवस ते १ महिन्याच्या अंतराने लावावी.
उत्पादन
लिंबू बागेची शास्त्रीय पद्धतीने निगा राखल्यास साधारण लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून फळे सुरू होतात. एका झाडापासून ५० ते १०० ग्रॅम वजनाची ४०० ते ५०० फळे मिळतात. ५ ते ७ वर्षाच्या पूर्ण वाढलेल्या निरोगी झाडापासून प्रति वर्षी सरासरी २००० ते २५०० फळे मिळतात, तर साई शरबती आणि फुले शरबती या वाणांपासून त्याहीपेक्षा अधिक फळे मिळतात.